नाशिक : प्रतिनिधी
स्मार्ट मीटर ही काळाची गरज असून त्याबाबत पसरवल्या जाणाऱ्या अफवांवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये. स्मार्ट मीटरमुळे वाढीव वीज बिल येते, या समजुतीत तथ्य नाही. ज्यांच्या वीज बिलाबाबत काही शंका किंवा तक्रारी असतील, त्यांनी महावितरण कार्यालयाशी संपर्क साधावा. आवश्यक असल्यास संबंधित ग्राहकांच्या घरी जाऊन प्रत्यक्ष पाहणी करून समाधानकारक मार्गदर्शन केले जाईल, अशी ग्वाही महावितरणचे अधीक्षक अभियंता अनिल थोरात यांनी दिली.
दिंडोरीरोडवरील सप्तश्रृंगी नागरी सहकारी पतसंस्था, मेरी येथे थोरात यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी पतसंस्थेच्या कार्याचा आढावा घेत त्यांनी ग्राहकाभिमुख सेवांचे कौतुक केले. या प्रसंगी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुभाष काकड, संचालिका व नगरसेविका दीपाली गीते, उपाध्यक्ष ॲड. राजाराम लोहकरे, सचिव अरुण मस्के, संचालक एस. यू. पाटील, डी. आर. पाटील, अविनाश दरगोडे, सुरेश चव्हाण, अजय मुळाणे, संचालिका सविता मस्के, व्यवस्थापक अमोल सूर्यवंशी, तसेच राम म्हस्के उपस्थित होते.
थोरात म्हणाले की, सप्तश्रृंगी नागरी सहकारी पतसंस्था गेल्या 30 वर्षांपासून वीज बिल ग्राहकांच्या सेवेत कार्यरत आहे. ती ग्राहकांना आर्थिक पाठबळ देत त्यांच्या सर्वांगीण विकासाचे ध्येय संस्थेने जपले आहे. संस्थेच्या या उल्लेखनीय कार्याबद्दल थोरात यांनी संस्थेचे संचालक मंडळ व पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.
सदिच्छा भेटीदरम्यान महावितरण आणि पतसंस्था यांच्या माध्यमातून ग्राहकांना अधिक प्रभावी व पारदर्शक सेवा देण्यासाठी परस्पर सहकार्य वाढविण्याबाबत चर्चा करण्यात आली.
—