नाशिक : प्रतिनिधी
नाशिकच्या राजकारणात ‘गौरव’पर्व सुरू झाले असून, नाशिक महापालिका पंचवार्षिक निवडणुकीत पंचवटीतील प्रभाग क्रमांक तीनमधून भारतीय जनता पक्षाचे युवा, तडफदार नेतृत्व, ॲड. गौरव गोवर्धने यांनी एक नवा अध्याय लिहिला आहे. राजकारणातील दिग्गजांना धक्का देत, त्यांनी पहिल्याच प्रयत्नात नगरसेवक म्हणून दणदणीत विजय संपादन केला. ही निवडणूक केवळ स्थानिक लढत नव्हती, तर ती राजकीय प्रतिष्ठेची लढाई बनली होती, ज्यात गोवर्धने यांनी आपले नेतृत्व सिद्ध केले.
गोवर्धने यांनी तब्बल १६ हजार ७२९ मते मिळवून एकहाती वर्चस्व प्रस्थापित केले. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) उमेदवार अंबादास खैरे यांचा नऊ हजार १८ मतांच्या फरकाने पराभव केला. मतदारांनी सर्व राजकीय गणितांना झुगारून लावत भाजपच्या तरुण नेतृत्वाला स्पष्ट कौल दिला. प्रचाराच्या सुरुवातीला जाणवलेले आव्हान प्रत्यक्ष निकालात निष्प्रभ ठरले, हेच स्पष्ट झाले.
“या विजयामुळे प्रभागातील भाजपची ताकद लक्षणीय वाढली असून, गोवर्धने यांच्यासह अ गटातून प्रियंका माने, ब गटातून जुई शिंदे, आणि क गटातून मच्छिंद्र सानप हे देखील विजयी झाले आहेत. प्रभागातील चारही जागांवर कमळ फुलल्याने भाजपमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. आमदार राहुल ढिकले आणि माजी आमदार बाळासाहेब सानप यांचे मार्गदर्शन या विजयात महत्त्वपूर्ण ठरले.
आगामी कुंभमेळ्याचे महत्त्वाचे स्थान साधुग्राम आणि तपोवन याच प्रभागात असल्याने, सुशिक्षित, अभ्यासू आणि कायद्याचे सखोल ज्ञान असलेल्या ॲड. गौरव गोवर्धने यांच्यावर महापालिकेत महत्त्वाची जबाबदारी सोपवली जाईल, असा प्रबळ विश्वास प्रभागातील नागरिक आणि समर्थक व्यक्त करत आहेत.”
—