नाशिक : प्रतिनिधी
विद्यार्थ्यांची गुणवत्ता ही फक्त प्रगतीपत्रकातील गुणांवर नाही, तर त्याच्या अंगी असलेल्या विविध कौशल्याचा वापर त्याच्या प्रगतीसाठी त्याने करावा, यासाठी शिक्षक पालक आणि विद्यार्थी स्वतः या त्रिसूत्रीने एकत्र येऊन भावी नागरिक घडविण्यासाठी प्रयत्न करावेत, असे प्रतिपादन सहाय्यक शिक्षण संचालक एल. डी. सोनवणे यांनी केले.
तरुण ऐक्य मंडळ संचलित श्रीराम विद्यालयाच्या ६५ व्या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या मुख्य कार्यक्रमप्रसंगी सोनवणे बोलत होते.
ते म्हणाले की, विद्यार्थ्यांला वेळेचे नियोजन करून आपले ध्येय निश्चित करणे जमले पाहिजे. सभोवताली असलेल्या प्रतिकूल परिस्थितीतही सकारात्मक प्रेरणा त्याला घेता आली पाहिजे. आयुष्याकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टिकोन बाळगून मेहनत घेत त्याने आपले आयुष्य उभे केले पाहिजे. शिक्षणाने तो सुशिक्षित होईलच, पण त्याला माणूस म्हणून जगता आले पाहिजे. यासाठी प्रत्येकाने प्रयत्नशील राहावे, असेही त्यांनी नमूद केले.
वर्षभरात विविध शैक्षणिक, क्रीडा, सांस्कृतिक गुणवत्ता प्राप्त करणाऱ्या ४७ विद्यार्थ्यांना या स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने रोख पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. तरुण ऐक्य मंडळ संस्थेचे अध्यक्ष बाबुराव मुखेडकर, उपाध्यक्ष चंद्रकांत धोत्रे, शालेय समितीचे अध्यक्ष ॲड. राहुल मुखेडकर, माजी प्राचार्य सुभाष पाटील, लता फोकणे, एस. टी. शिंदे, ज्येष्ठ शिक्षक सी. एन. देशमुख, योगेश धोत्रे, नवभारत प्राथमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका धनगरे, उपमुख्याध्यापक उमेश आटवणे, शाळा व संस्थेचे इतर पदाधिकारी व मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
स्वागत गीत म्हणण्यात आले. प्राचार्य सुधीर नवसारे यांनी प्रास्ताविक केले. पर्यवेक्षक रघुनाथ सुरसे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. काशिनाथ चोपडे यांनी आभार मानले. रूपाली जाधव यांनी सूत्रसंचालन केले. गुणगौरव सोहळ्यानंतर सुंदर असा सांस्कृतिक कार्यक्रम शालेय विद्यार्थ्यांनी सादर केला. यासाठी सांस्कृतिक विभागातील सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले.
—
माणूस म्हणून जगायला शिका : सहाय्यक शिक्षण संचालक एल. डी. सोनवणे
Get real time updates directly on you device, subscribe now.